मुलींच्या जन्मानंतर २५ हजार कायम ठेवीचीही मागणी
ताम्हणकरांचे दावे
हुंडा पद्धतीस लाडलीमुळे वाव
अपंग विवाहितेचे आत्महत्या प्रकरण दडपले
योजना मतांसाठी राबविली
ज्या हेतूने सरकारने लाडली लक्ष्मी योजना राबविली आहे तो हेतू पूर्णपणे असफल झाल्याचा दावा कॉंग्रेसचे प्रवक्ते सुदिप ताम्हणकर यांनी केला आहे. या योजनेमुळे हुंडा पद्धतीस अधिक वाव मिळत असून त्यातून विवाह मोडण्याचे प्रकार घडत आहेत. परिणामी सरकारने वरील योजना बंद करून मुलीच्या जन्मानंतर त्यांच्या नावावर पंचवीस हजार रुपये कायम ठेव जमा करावी, अशी मागणी ताम्हणकर यांनी काल पत्रकार परिषदेत केली.
लाडली लक्ष्मी योजनेखाली मिळालेला धनादेश ताब्यात देण्याची मागणी लग्न नोंदणीनंतर पती पत्नीकडे करण्याचे अनेक प्रकार घडले आहेत. फोंडा तालुक्यातील एका विवाहित अपंग युवतीवर आत्महत्या करण्याची पाळी आल्याचे सांगून सदर प्रकरण दोन मंत्र्यांच्या वशिल्यामुळे दडपून टाकण्यात आल्याचा आरोप ताम्हणकर यांनी केला. यासंबंधीचे सर्व पुरावे आपल्याकडे उपलब्ध असल्याचे ताम्हणकर यांनी सांगितले.
मुलीच्या जन्मानंतर तिच्या नावावर २५ हजार रुपये जमा केल्यास १८ वर्षानंतर त्याचे व्याज मिळेल. त्यामुळे पालकांनाही मदत होऊ शकेल. या पैशांवर नवर्याला हक्क सांगता येणार नाही, असे ताम्हणकर यांनी सांगितले. सरकारने लाडली लक्ष्मी योजना मते मिळविण्यासाठीच राबविल्याचा आरोप त्यांनी केला.