- डॉ. मनाली महेश पवार
अन्नसेवन करताना त्याच्या आधी आणि नंतरसुद्धा प्रसन्न वृत्तीने आणि चांगल्या विचारांनी, चांगल्या भावनांनी युक्त असणे हे अन्नपचन आणि एकूणच शारीरिक आरोग्य आणि वैचारिक समृद्धी यासाठी आवश्यक आहे.
मलावरोधामधील आहारीय व विहारीय कारणे जेवढी महत्त्वाची आहेत, तेवढीच मानसिक कारणेही महत्त्वाची आहेत. आज ‘टेन्शन’ हा शब्द एवढा कॉमन बनला आहे की लहानांपासून मोठ्यांच्या तोंडात तो सर्रास असतो. असेच काही मानसिक भाव आहेत जे टेन्शन उत्पन्न करतात, तेच अपचन किंवा पुढे मलावरोधाला कारणीभूत ठरतात. ते भाव (कारणे) म्हणजे- ईर्ष्या, भय, क्रोध, लोभ, शोक, दैन्य, द्वेष. अशा प्रकारची मानसिक कारणे वात व मुख्यतः पित्ताला दूषित करून अपचन घडवून आणतात.
ईर्ष्या ः दुसऱ्याचा उत्कर्ष, प्रगती, यश, समृद्धी आपल्याला सहन न होणे म्हणजे ईर्ष्या. सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे स्पर्धा करणे, माझ्यापुढे दुसरा नको ही भावना व त्यासाठी प्रयत्न करणे किंवा दुसऱ्याबद्दल असणारी असूया, मत्सर भावना. आजचा व्यावहारिक अचूक शब्द म्हणजे ‘जेलसी.’ आणि ही ईर्ष्येची भावना अगदी कोवळ्या वयात बालमनावर नकळत कोरली जाते. तुला क्लासमध्ये पहिले यायचे आहे, तुला खेळात पहिले यायचे आहे, तुला या स्पर्धेत पहिले आणि त्या स्पर्धेत पहिले…’ दुसरा, तिसरा कोणीच नाही. प्रत्येकाला आपल्या मुलांना ‘ऑल राऊंडर’ बनवायचे आहे. पहिलेच विभक्त कुटुंबपद्धती, त्यात एखादं मूल आणि त्यावर वर्गात, शाळेत स्पर्धा. मुक्तपणे जगणं नाहीच. सदानकदा दडपणाखाली मूल. संघप्रवृत्ती, एकजूट न शिकवता फक्त स्पर्धा आणि चुरस. मी, मी आणि मीच… त्यात भर म्हणून हे टीव्ही शो. मुलांच्या कोमल, सोज्वळ, लाघवी, लोभसपणाची जागा कधी ईर्ष्येने घेतली ही कोणालाच कळले नाही. हीच ईर्ष्या मनात, पोटात घेऊन मुलं मोठी होतात. यामध्ये स्वतःचीच शारीरिक, वैचारिक, बौद्धिक, भावनिक दमछाक होत असते.
ईर्ष्या, मत्सर, जेलसी हे आम्लपित्त, ॲसिडिटी होण्याचे मुख्य कारण आहे. ही जी सुडाची भावना स्पर्धेचा विचार जाळत असते, उष्णता निर्माण करत असते, त्यामुळे शरीरामध्ये पित्ताची, अग्नीची वृद्धी होते. रक्ताचा विदाह होतो. रक्त सळसळतं म्हणजे तरी दुसरं काय… कॉर्टिसोल लेव्हल्स वाढतात. त्यामुळे अन्नपचन नीट होत नाही. ते एकाच जागी अडकलेले राहते. जशी विचारांची जळजळ, तीच पोटामध्ये, अन्नपचनामध्ये व्यक्त होते. म्हणून पोटात जळजळ, आंबट, कडू, छातीत जळजळ, घशात जळजळ, क्वचित पित्ताची आंबट-कडू उलटी, कानशील गरम होणे! हे सगळं उलटी होऊन शरीरातून बाहेर पडल्यावर बरं वाटतं.
त्याचप्रमाणे ईर्ष्या, मत्सर, विचारांचा गोंधळ इतरांबरोबर शेअर केला, संवाद साधला की जळजळ, दाह निश्चितपणे कमी होतो. ईर्ष्या ही भावना मनात गोंधळ उत्पन्न करून अकारण श्रम करायला लावते, त्यामुळे छाती धडधडणे सुरू होते. ‘तू हे मिळवलेच पाहिजे’ हे टेन्शन अगदी लहान वयापासून रिटायरमेंटला आले तरी तसेच राहते. त्यामुळे ‘नंबर’ ही स्पर्धा फक्त समाधान व आनंदापुरती ठेवायची. स्वतःची मर्यादा ओळखायची का घोड्यांच्या रेसमध्ये आपण व आपल्या मुलांना पळवायचे हे आपणच ठरवायला हवे. कारण ‘मलावरोधा’चा उगम हा अगदी कोवळ्या वयात इथेच झालेला असतो व पुढे हे लक्षण अनेक असाध्य अशा आजारांना निमंत्रण देत असते हे लक्षात असू द्या.
जसे ईर्ष्या, मत्सर, जेलसी, हेवे-दावे या विचारांबाबत, भावनांबाबत आहे, अगदी तसेच थोड्याफार फरकाने भीती, क्रोध, लोभ, शोक, दैन्य या भावनांचे हे विचार. भावना अन्नपचनाला, आरोग्याला, समाधानाला नष्ट करणारे ठरतात.
- भीती ः भीती असेल तर तुम्हाला कितीही चांगलं खायला घातलं तरी त्याचा शरीराला काहीच उपयोग होत नाही. उदा. गेले सहा महिने माझ्याकडे एक स्त्री बद्धकोष्ठता, अपचन आणि कमी होत चाललेले वजन यासाठी सतत येत आहे. सगळी औषधे देऊन झाली. गुण मिळत नाही म्हणून रीतसर पुन्हा रुग्णाला पूर्वकालाबद्दल विचारल्यावर समजलं, या बाईला पालींची प्रचंड भीती वाटते. घरात एकटी राहत असल्याने एकदा कधीतरी दरवाजा उघडल्यावर समोर पाल पडली तेव्हापासून पालीचा एवढा धसका घेतला की घरातून बाहेर पडायला घाबरू लागली. बराच वेळ समुपदेशन केल्यावर थोडीशी तिची भीती कमी झाली व माझ्या औषधांनाही गुण मिळू लागला.
आज आपण प्रत्येकजण कुठल्या ना कुठल्या भीतीमध्ये वावरत असतो. मला एवढे गुण नाही मिळाले तर मला एम.बी.बीएस.ला, इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळणार नाही, या भीतीपोटीच आपला योग्य दिशेने अभ्यास होत नाही, आपण भरकटतो, एक ना भाराभर चिंध्या अशी अवस्था होते. सतत भयग्रस्त वातावरणात आपण जगत असतो. याने आपली बुद्धी विफल, दुर्बल, क्षीण होते. भीती ही भावना वातदोषाला वाढवते. वात वाढल्याने पचनसंस्थेच्या समस्या उद्भवतात. त्यात बद्धकोष्ठता, पोट फुगणे, गॅस, अनियमित भूक, अपचन यांसारखी लक्षणे उत्पन्न होतात. - क्रोध ः मला ‘राग’ येतच नाही असे म्हणणारे आज सापडणारच नाही. कारण जिकडे-तिकडे स्पर्धा! स्पर्धेतून मत्सर, ईर्ष्या व त्यातूनच पुढे क्रोध. क्रोध ही भावना पित्तदोषाला वाढवते. क्रोधामुळे चिडचिड, त्रागा, आदळआपट, आत्मक्लेश होतो. शरीरातील उष्णता, पित्ताची वाढ होते. आपल्याला हवी तशी घटना न घडल्यामुळे क्रोध ही भावना उत्पन्न होते. या झटापटीमध्ये आपल्या विचारांची, भावनांची, बुद्धीची होरपळ होते आणि त्याचेच परिणाम अन्नपचन, शरीर, यकृत यांवर कालांतराने निश्चितपणे दिसतात.
क्रोध नियंत्रणात आणायचा सर्वात उत्तम उपाय म्हणजे- ‘लेट गो!’ जाऊ दे…! सांगणे सोपे आहे, पण कृतीत आणणे कठीण. पण हे असलं तर आरोग्य, समाधान, शांती- सगळंच मिळवता येतं. - शोक ः शोक ही भावना पराभवानंतर, एखादी गोष्ट गमावल्यानंतर, ती आपल्याला ‘कधीच मिळणार नाही’ या नैराश्यातून, वैफल्यातून येते. शोकाचा फार मोठा दुष्परिणाम अन्नपचन संस्थेवर होतो. एका स्त्रीचं तान्हुलं बाळ गेल्यावर सतत आठ दिवस अगदी लालचुटूक रक्त संडासावाटे पडत होतं. त्या स्त्रीला ना मूळव्याधाचा त्रास, ना अल्सरचा. शोक व्यक्त करण्यासाठी जर पुरेशा प्रमाणात ‘अश्रूंचा निचरा’ झाला नाही तर अन्नपचन संस्थेमध्ये रक्तस्राव होतो, असे आयुर्वेदशास्त्रात सांगितले आहे.
म्हणून शोक झाला तरी ती जीवनातील अपरिहार्य घटना होती असे स्वतःला समजावून किंवा इतरांकडून समजावून घेऊन, त्यातून शक्य तितक्या लवकर बाहेर पडून वस्तुस्थितीचा स्वीकार करणे हेच योग्य. - दैन्य ः दैन्य ही पराभूत वैचारिक, भावनिक परिस्थिती आहे. शोक ही पराभवाची भावना असते आणि पराभवानंतर आता मला या प्रकारचा विजय मिळवण्यासाठी ‘कधीही सामर्थ्य लाभणार नाही’ अशी निश्चित पराभवाची भावनिक स्थिती म्हणजे दैन्य. सामर्थ्याच्या अगदी विरुद्ध म्हणजे दीनपणा.
दैन्यानंतरचा स्वाभाविक परिणाम म्हणजे द्वेष. आधी ती वस्तू आपल्याला हवी असते, त्या वस्तूबद्दल आपल्याला लोभ, लालसा, प्रेम सगळं असतं; पण एकदा आपली योग्यता, बल, लायकी तितकी नाही हे स्पष्ट झाले तर मग माणूस चिडतो, त्याला क्रोध येतो, तो निराश होतो, शोक होतो, कमी सामर्थ्याची जाणीव होऊन दैन्य येते आणि मग ती वस्तू कधीच मिळवता येत नाही! असे झाले की त्या वस्तूबद्दल किंवा त्या माणसाबद्दल द्वेष निर्माण होतो. या सर्व दुर्भावना एकमेकांवर अवलंबून आहेत आणि ह्या सगळ्याचा परिणाम जठराग्नीवर म्हणजे अन्नपचनावर होतो.
म्हणूनच अन्नसेवन करताना त्याच्या आधी आणि नंतरसुद्धा प्रसन्न वृत्तीने आणि चांगल्या विचारांनी, चांगल्या भावनांनी युक्त असणे हे अन्नपचन आणि एकूणच शारीरिक आरोग्य आणि वैचारिक समृद्धी यासाठी आवश्यक आहे.