पहलगाममधील बैसरानचे नितांतसुंदर हिरवेगार कुरण दहशतवाद्यांनी निष्पापांच्या रक्ताने लाल केले. संविधानाचे 370 वे कलम हटवल्यापासून हळूहळू आकाराला येत असलेल्या ‘नया कश्मीर’चे स्वप्न धुळीला मिळवण्यासाठीच निःशस्त्र, निरपराध पर्यटकांना लक्ष्य करून हे हत्याकांड घडवले गेले आहे हे उघड आहे. काश्मीरमधील स्थिती पूर्वपदावर येऊ लागली आहे, काश्मीर बदलू लागले आहे, स्थानिक जनता मुख्य प्रवाहात सामील होऊ लागली आहे हे पाहून अस्वस्थ बनलेल्या दहशतवाद्यांनी बैसरानमध्ये हा उत्पात माजविला. केवळ पुरुष पर्यटकांना ह्या हल्ल्यात लक्ष्य करण्यात आले. आधी त्यांचा धर्म विचारला गेला आणि पत्नी आणि मुलांच्या देखत अत्यंत क्रूरपणे त्यांना गोळ्या घातल्या गेल्या. हैवानियत म्हणतात ती ह्याहून वेगळी नसेल. अमेरिकेचे उपराष्ट्रपती जे. डी. व्हान्स यांची सध्या सुरू असलेली खासगी भारतभेट आणि येत्या 3 जुलैपासून सुरू होणार असलेली अमरनाथ यात्रा ह्या पार्श्वभूमीवर हा दहशतवादी हल्ला झाला आहे. काश्मीरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा यंत्रणा यांच्यात अगणित चकमकी आजवर झडत आल्या, परंतु पर्यटकांना सहसा लक्ष्य केले जात नसे. परंतु सुरक्षा दलांशी दोन हात करणे आता सोपे राहिलेले नसल्याने पर्यटकांसारख्या ‘सॉफ्ट टार्गेट’वर हल्ला चढवून आपले अस्तित्व दाखवून देण्याचा आटापिटा दहशतवादी शक्ती अधूनमधून करत असतात. मात्र, मृतांची संख्या लक्षात घेता रियासीमधील दहशतवादी हल्ल्यानंतरचा पर्यटकांवरील हा सर्वांत मोठा हल्ला म्हणावा लागेल. बैसरनचे कुरण हे पहलगामच्या डोंगरावर वसले आहे आणि तेथे केवळ घोड्यावरूनच जाता येते. स्थानिक गुज्जर आणि बकरवाल पर्यटकांना तेथे घेऊन जातात. तेथवर पोहोचण्यास जवळजवळ अर्धा तास लागतो. त्यामुळे अशा दुर्गम ठिकाणी सुरक्षा यंत्रणा नसल्याचा फायदा उठवून ह्या पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. वास्तविक, काश्मीरमधील अस्थिर परिस्थिती लक्षात घेता, जेथे शेकडो पर्यटक एकत्र येत असतात, अशा बैसरनमध्ये देखील सुरक्षा दलांची गस्त असणे आवश्यक होते. परंतु ती नसल्यानेच दहशतवाद्यांनी ही संधी साधली. हल्लेखोरांमध्ये काही पाकिस्तानी दहशतवादी असल्याचे दावे केले जात आहेत, परंतु स्थानिक पाठबळाविना एवढ्या दुर्गम भागामध्ये अशा प्रकारचा दहशतवादी हल्ला चढवून पळून जाणे त्या परिसराशी परिचित नसलेल्यांना शक्यच नाही. गुप्तचर यंत्रणांचे देखील हे मोठे अपयश आहे. एवढ्या मोठ्या दहशतवादी हल्ल्याची तयारी केली जात असताना त्याचा त्यांना थांगपत्ताही नव्हता. शिवाय पाकिस्तानी दहशतवादी ह्यामध्ये सामील असतील तर सीमेपलीकडून ते खोऱ्यात येऊन स्थानिक आश्रय घेईपर्यंत आणि हा दहशतवादी हल्ला चढवीपर्यंत गुप्तचर यंत्रणेला काहीही खबर नव्हती हेही यातून स्पष्ट झाले आहे. ह्या हल्ल्यानंतर नेमके काय घडले आणि किती बळी गेले ह्याची अधिकृत माहिती देण्यास कोणी पुढे आले नाहीत हाही प्रकार गैर होता. खरी माहिती दडपून ठेवण्याच्या अशा वृत्तीमुळे अफवांचे पीक येते हे संबंधितांना कळायला हवे. हल्ल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री तात्काळ श्रीनगरला रवाना झाले व त्यांनी जातीने घटनास्थळाची पाहणी केली व पंतप्रधानही आपला सौदी अरेबियाचा दौरा अर्ध्यावर टाकून परतले. परंतु केवळ मृतांच्या परिजनांचे सांत्वन आता पुरेसे नाही. संपूर्ण देश आज ह्या हत्याकांडाचा बदला हे सरकार कसे घेते हे पाहण्यास आतुर आहे. ह्या हल्ल्याची जबाबदारी द रेसिस्टन्स फ्रंट ह्या दहशतवादी संघटनेने स्वीकारली आहे. 370 वे कलम हटवले गेल्यानंतर ही स्थानिकांची चळवळ असल्याचे भासवण्यासाठी हे नाव घेतले गेले असले, तरी शेवटी ही लष्कर ए तोयबा आणि जैश ए महंमदचीच पिलावळ आहे. पाकिस्तानच्या आयएसआयनेच प्रशिक्षण देऊन त्यांना काश्मीरमध्ये थैमान घालवण्यास पाठवलेले आहे. त्यामुळे घाव आता मुळावर घालायला हवा. बालाकोटच्या कारवाईनंतर हादरलेल्या पाकिस्तानच्या उचापती बरेच महिने बंद पडल्या होत्या. आता दहशतवादी शक्ती जर पुन्हा डोके वर काढू लागल्या असतील, तर त्याचा हिशेब वेळीच चुकता झाला पाहिजे. ह्या तथाकथित रेसिस्टन्स फ्रंटचा म्होरक्या सैफुल्ला खालिद आणि त्याचे हस्तक काश्मीरमध्ये जिथे कुठे दडले असतील, तेथून हुडकून काढून त्यांना कंठस्नान घालण्यासाठी व्यापक मोहीम सुरक्षा दलांना सर्वशक्तीनिशी राबवावी तर लागेलच, परंतु ह्या दहशतवाद्यांची सर्वतोपरी पाठराखण करीत आलेल्या पाकिस्तानला पुन्हा एकदा जबरदस्त धडा शिकवण्याचीही वेळ नक्कीच आलेली आहे. आज सूडाने पेटलेला अवघा देश मोदी सरकारकडे मोठ्या अपेक्षेने पाहतो आहे. उरी आणि पुलवामाचा सूड घेतला गेला. बैसरनचे बलिदानही वाया जाता कामा नये.