केळावडे केरी-सत्तरी येथील युवक रवीनाथ मुकुंद गावस (३०) हा कणकुंबी येथे झालेल्या अपघातात जागीच ठार झाला. रवीनाथ आपल्या स्प्लेंडर दुचाकीने (जीए ०४ ए ७३८६) घराकडून नातेवाईकांच्या बाराव्या दिवसाला भेटण्यासाठी बेटणे – खानापूर येथे जात होता. कणकुंबी नर्सरीजवळ चढावावर असताना समोरून भरधाव वेगाने येणार्या स्विफ्ट कारने जोरदार धडक दिल्याने तो जागीच ठार झाला.
सदर परिसर खानापूर तालुक्यात येत असल्याने खानापूर पोलिसांनी पंचनामा केला व मृतदेहाची शवचिकित्सा करून रात्री मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. रवीनाथचे मे महिन्यातच लग्न झाले होते. त्याच्या पश्चात पत्नी, भाऊ, भावजय, आई वडील असा परिवार आहे.