‘इंडिया’ कुठेय?

0
8

‘संविधान खतरे मे है’ ची हाकाटी करीत मोठ्या जोशात स्थापन झालेल्या ‘इंडिया’ आघाडीचे नामोनिशाण गेल्या लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर आज ऐकू येईनासे झाले आहे. राज्याराज्यांमध्ये ‘इंडिया’ आघाडीच्या घटक पक्षांमध्येच ‘तू तू मै मै’ रंगले आहे. आपला गोवाही याला अपवाद नाही. वास्तविक, एका समान उद्दिष्टासाठी, आपसातील मतभेद बाजूला ठेवून जेव्हा हे राजकीय पक्ष एकत्र आले होते, तेव्हा ही एकजूट टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्नांची शर्थ करणे ही प्रत्येक घटक पक्षाच्या नेतृत्वाची जबाबदारी होती. मात्र, केवळ लोकसभा निवडणुकीत स्वार्थ साधण्यासाठीच हे कडबोळे एकत्र आले होते की काय असा मतदारांना प्रश्न पडावा तशी ह्या आघाडीची स्थिती आज झालेली आहे. ज्या वेगाने हे लोक एकत्र आले होते, त्याच्या दुप्पट वेगाने एकमेकांपासून दूर गेले आहेत. कारण काय, तर आपापल्या राज्यामधील मित्रपक्षासाठी जागा न सोडण्याची आणि सत्तेचा वाटा स्वतःच उपभोगण्यासाठी धडपडण्याची वृत्ती. मात्र, परिणामी मतविभाजन होऊन त्याचा फायदा सत्ताधारी राष्ट्रीय लोकशाही आघाडीला होत आहे हे ठिकठिकाणच्या निवडणुकांत दिसूनही त्याची तमा कोणी बाळगताना दिसत नाही. ‘इंडिया’ आघाडीतील प्रत्येक घटक पक्षाला आपले राजकीय अस्तित्व टिकवण्यापलीकडे इतर व्यापक उद्दिष्टांची काही फिकीर दिसत नाही. काँग्रेस पक्ष अजूनही ‘बिग ब्रदर’ च्या भूमिकेत आहे. आपण ठरवू ते धोरण आणि आपण म्हणू ते ब्रह्मवाक्य या काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भूमिकेमुळे त्यांच्या ‘अदानी, अदानी’च्या घोषाला उबगलेल्या इतर पक्षांनी सवता सुभा मांडला. जनसामान्यांचे प्रश्न हाती घेण्याऐवजी केवळ मोदी यांना लक्ष्य करण्याची काँग्रेसची रणनीती जनतेच्या पचनी पडली नाही आणि अन्यपक्षीय विरोधी नेत्यांच्याही. त्याला व्यक्तिगत संघर्षाची अवकळा आली. वास्तविक, काँग्रेसने आपल्या ‘भारत जोडो’ यात्रेने एक सकारात्मक वातावरण निर्माण केले होते. परंतु जनतेने पदरात घातलेले दान स्वकर्माने गमावणे हा काँग्रेस नेतृत्वाचा धर्मच होऊन बसला आहे. त्यामुळे जनतेने ठिकठिकाणी दिलेले यश नेतृत्वास पेलताच येत नाही हेच पुन्हा पुन्हा दिसून येते. केवळ लोकसभा निवडणुकीपुरते एकत्र येणे आणि विधानसभा निवडणुकांमध्ये मात्र एकमेकांच्या झिंज्या उपटणे ही नीती यापुढे ‘एक देश एक निवडणूक’ प्रत्यक्षात आली तर कशी काय कामी येईल? राष्ट्रीय पक्षाचा दर्जा प्राप्त झाल्यानंतर आम आदमी पक्षाच्या महत्त्वाकांक्षांनी तर अस्मान गाठले होते. मात्र, दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पानीपतानंतर ‘आप’चे महत्त्वच संपुष्टात आले आहे. काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात समझोता झाला असता, थोडी तडजोड दोन्ही बाजूंनी झाली असती, तर दिल्लीत आज वेगळे चित्र असते. परंतु स्वतःच्या महत्त्वाकांक्षांना मुरड घालण्याची या पक्षांची तयारीच नसते हेच तर ‘इंडिया’च्या अपयशाचे सर्वांत प्रमुख कारण आहे. जी स्थिती दिल्लीत, तीच राज्याराज्यांत आहे. त्यामुळेच ‘इंडिया’ आघाडीची शकले उडाली आहेत. शरद पवार, ममता बॅनर्जी, राहुल गांधी, अरविंद केजरीवाल ह्या आणि इतर पक्षांच्या नेत्यांच्या व्यक्तिगत महत्त्वाकांक्षा मोठ्या आहेत आणि त्या साध्य करण्यापुरती त्यांना ‘इंडिया’ आघाडीची जरूरी भासत असते. त्या साध्य होत नाहीत हे दिसताच ते झपाट्याने एकमेकांपासून दूर जातात असाच अनुभव आहे. आपल्या गोव्यात भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी सर्व विरोधकांनी एकत्र येण्याच्या गर्जना केल्या होत्या. परंतु आम आदमी पक्षाने आगामी निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा करून आघाडीतली हवाच काढून घेतली. स्वबळाची भाषा करणाऱ्या आपचे विद्यमान आमदार सत्ताधारी भाजपशी जवळीक साधत असल्याचे दिसत आहे. दुसरीकडे काँग्रेसमध्येच अंतर्गत मतभेद उफाळले आहेत. ह्या अशा विस्कळीत रणनीतीनिशी आगामी निवडणुकीला हे लोक कसे सामोरे जाणार आहेत? देशभरात राज्याराज्यांत भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीला जे यश प्राप्त होत आहे, त्यामध्ये पंतप्रधानांची प्रतिमा, ‘डबल इंजिन’ कामगिरी, पक्षसंघटन व निवडणूक व्यवस्थापन ह्या सगळ्या गोष्टी तर कारणीभूत आहेतच, परंतु त्याहून अधिक दुबळे, विस्कळीत विरोधक हे अधिक कारणीभूत आहेत. ‘एकीचे बळ’ ही गोष्ट फक्त पाठ्यपुस्तकांपुरतीच उरली आहे. विरोधी पक्ष एकत्र आले, तर सत्ताधाऱ्यांवर अंकुश ठेवू शकतात, परंतु जो तो केवळ स्वतःच्या कोशात दंग आहे. आज देशामध्ये विरोधी पक्ष केवळ संसद अधिवेशनात आरडाओरडा करण्यापुरताच मर्यादित उरलेले दिसत आहेत. जनतेसाठी जे मूलभूत मुद्दे हाती घ्यायला हवेत ते कोणीही हाती घेताना दिसत नाही. हे असेच चालत राहिले तर ‘इंडिया’ ची धूळधाण उडायला फार वेळ उरणार नाही.