शिक्षण ः अखंड तेवणारा नंदादीप

0
183
  •  सौ. नीता महाजन

शाळेतला फळा, खडू, पुस्तक हेच केवळ शिकवण्याचे साधन नाही तर आजच्या या परिस्थितीत मोबाईल, टीव्ही, रेडिओ ही माध्यमे खूप चांगल्या पद्धतीने शिक्षणाचा प्रसार करीत आहेत. आज काळाची ती गरज आहे. याप्रमाणे शिकणारा प्रत्येक गोष्टीतून निरंतर शिकत असतो. नंदादीप अखंड तेवतच असतो.

आज सरस्वतीचे हे मंदिर आहे सुने सुने. शाळेचा प्राण म्हणजेच ‘विद्यार्थी’ येथे नाहीत. विद्यार्थ्यांविना शाळा म्हणजे सुगंधविहीन पुष्पच जणू. विद्यार्थ्यांनादेखील शाळा कधी सुरू होईल याचे वेध लागले असतील. कारण शाळेतली मजा घरी नाही करता येत.
शाळा आणि शिक्षक, किंबहुना दोेघेही अस्वस्थ आहेत.

प्रेम करणारे, आदर देणारे तर कधी खट्याळ खोडी करणारे पण हवेहवेसे वाटणारे विद्यार्थी शाळेत नाहीत. शाळा म्हणजे नसतात केवळ वर्गाच्या चार भिंती, लाकडी बाक व भिंतीवरचा फळा. या तर निर्जीव वस्तू आहेत. परंतु मुले जेव्हा या वास्तूत प्रवेश करतात तेव्हा या वस्तू सजीव होऊन बोलू लागतात. फळा तर नवीन शब्द, चित्रे, गणिते सोडवण्यासाठी जणू तत्पर असतो. साधा पांढरा खडूदेखील आपला देह झिजताना स्वतःला धन्य मानत असावा की माझे जीवन सार्थकी लागले म्हणून. जशी एखादी वात स्वतः जळून अंधारात प्रकाशाचा किरण आणते, अशी ही शाळा केवळ भिंतीरूप वास्तू नसते. तिच्याशी निगडित अनेक आठवणी, अनुभव प्रत्येकाच्याच गाठीला असतील. आमच्या बालपणी आम्ही साधे पत्र्याचे छप्पर असलेल्या झोपडीवजा, पावसाच्या दिवसांत टप् टप् गळणार्‍या शाळेत शिकलोय. पण ती शाळा आठवते अगदी जशीच्या तशी. कारण त्या शाळेनेच तर आम्हाला घडवले. प्राथमिक वर्गात असताना काही वर्षे आमची शाळा देवळात भरायची. मन खूप प्रसन्न होऊन जायचं. शाळेत जाताना व शाळेतून घरी परतताना मुख्यतः पावसाच्या दिवसांत खूप मजा यायची. रस्त्यात पाणी असायचे. अशा पावसात भिजत, पाण्यात खेळत घरी जाण्याची मजा काही औरच होती. आज ते बालपण पुन्हा जगावेसे वाटते. वाटेत खाल्लेल्या चिंचा, बोरे, काजू, आवळे, कैर्‍या, करवंदे हा रानमेवा आजही आठवतो. परंतु ते दिवस मात्र काही परत येणार नाहीत. उरल्या त्या फक्त आठवणी.
हे सगळे आठवण्याचं कारण म्हणजे ‘शाळा.’ कधी मनात विचारसुद्धा आला नसेल, कुणी अशी कल्पनादेखील केली नसेल असे हे आजचे दिवस आहेत. सर्वत्र कोरोनाची भीती पसरली आहे. शाळेच्या प्रशस्त इमारती जिथे कायम एक जिवंतपणा असायचा तिथे फक्त आणि फक्त शांतता आहे.

शिक्षक शाळेत येत नाहीत की विद्यार्थी. अशा या कठीण परिस्थितीत शिक्षक मुलांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करत आहेत. नवीन नवीन गोष्टी आत्मसात करून मुलांपर्यंत पोहोचत आहेत. निवृत्तीकडे वळलेले शिक्षकदेखील नवीन तंत्रज्ञान शिकत आहेत. कारण आम्हाला मुलांची काळजी आहे. विद्यार्थ्यांविना, शिक्षकांना शाळा पटत नाही. परंतु मुले जिथे आहेत तिथे सुखरूप आहेत याचा आनंद आहे.

ऑनलाईन, ऑफलाईन पद्धत वापरून शिक्षक मुलांना ज्ञानदान करत आहेत. परंतु ऑनलाईन शिकवणी शाळेला पर्याय ठरू शकत नाही. ही पद्धत मनाला पटत नाही. कारण आपण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो की नाही हे समजत नाही. मुलांच्या डोळ्यातले भाव टिपता येत नाहीत. शाळा म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नसून मुलांचा सर्वांगीण विकास येथे घडतो. मुले येथे अनेक गोष्टी शिकतात. मुलांचा सामाजिक, भावनात्मक, आध्यात्मिक विकास येथे घडतो. येथे अनेक प्रकारची देवाण-घेवाण असते. शिक्षकसुद्धा विद्यार्थी होऊन अनेक गोष्टी शिकतच असतात. विद्यार्थ्यांच्या मनातल्या अनेक भावना येथे व्यक्त होतात. शिक्षक विद्यार्थ्यांना आकार देतो. त्यांना समजून घेतो, योग्य ते मार्गदर्शन करतो.

हे सगळं जरी खरं असलं तरी आता या कोरोना महामारीच्या काळात शाळा सुरू करून विद्यार्थ्यांच्या उद्याच्या भावी पिढीचा जीव नाही धोक्यात घालू शकत आपण. त्यामुळे ज्याप्रमाणे मंदिराच्या गाभार्‍यात अखंड तेवणारा नंदादीप असतो, त्याचप्रमाणे ज्ञानाचा हा नंदादीप कायम तेवतच राहिला पाहिजे. ‘शो मस्ट गो ऑन’ म्हणतात त्याप्रमाणे स्वतःला सीमित न ठेवता आपणही काळानुरूप बदलले पाहिजे हे शिक्षकांना माहीत आहे. ज्ञानाचा हा स्रोत पाझरत राहिला पाहिजे, त्यासाठी मग तंत्रज्ञानाची जोड घेऊन आजच्या भाषेत अपडेट राहत मुलांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. नवीन गोष्टी आत्मसात करत या भावी पिढीला मानसिक आधार देत शिक्षणाची जोड दिली पाहिजे. आणि या सर्वांमध्ये मुख्य घटक आहेत ते या विद्यार्थ्यांचे पालक. त्यांची जबाबदारी आज वाढलेली आहे. आणि ते आपली जबाबदारी यथायोग्य पारही पाडत आहेत.

खरं पाहिलं तर आईवडील हेच पाल्याचे प्रथम गुरू असतात. म्हणूनच म्हणतात ना, मातृदेवो भवः, पितृदेवो भवः व नंतर आचार्यदेवो भवः. म्हणजेच पालक हेच मुलांचे गुरू आहेत. मुले त्यांच्याकडून अनेक गोष्टी शिकत असतात. काही दिवसांपूर्वीच ग. दि. माडगूळकर यांची ‘लाखो इथले गुरू’ ही कविता वाचनात आली. ज्यामध्ये बिनभिंतीच्या शाळेचे खरंच खूप सुंदर व सार्थ रूपात वर्णन केलं आहे. म्हणजे आपल्या आजूबाजूला असलेली प्रत्येक वस्तू आपल्याला काहीतरी शिकवत असते.
शाळेतला फळा, खडू, पुस्तक हेच केवळ शिकवण्याचे साधन नाही तर आजच्या या परिस्थितीत मोबाईल, टीव्ही, रेडिओ ही माध्यमे खूप चांगल्या पद्धतीने शिक्षणाचा प्रसार करीत आहेत. आज काळाची ती गरज आहे. शेवटी गदिमांनी म्हटल्याप्रमाणे-

बिनभिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू!

याप्रमाणे शिकणारा प्रत्येक गोष्टीतून निरंतर शिकत असतो. नंदादीप अखंड तेवतच असतो.