महाराष्ट्राचा कौल महायुतीला

0
117

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काल झालेल्या मतमोजणीत शेवटची निकाल हाती येईपर्यंत जाहीर झालेल्या निकालांनुसार भाजप १०५, शिवसेना ५६, कॉंग्रेस ४४, राष्ट्रवादी कॉंग्रेस ५४ आणि इतर उमेदवार २९ जागांवर आघाडीवर होते. यात शिवसेना-भाजप महायुतीचेच सरकार सत्तेवर येणार हे निश्‍चित झाले आहे. मात्र महायुतीला २०० चा टप्पा गाठता आलेला नाही. या निवडणुकीत १६४ जागा लढवणार्‍या भाजपला १०५ तर शिवसेनेला ५६ जागा मिळण्याची चिन्हे आहेत. भाजपला गेल्यावेळ पेक्षा यंदा जवळपास २२ जागांचे नुकसान होत असून राष्ट्रवादी कॉंग्रेसने भरारी घेतल्याचे दिसून येत आहे. विधानसभा निवडणुकीत महायुतीला मोठा विजय मिळेल असे चित्र होते मात्र यात बराच फरक पडलेला दिसून आला.

एमआयएमने दोन जागांवर तर मनसेने एका जागी विजय मिळवला आहे. या निवडणुकीत भाजपला २५.७१ टक्के, कॉंग्रेसला १५.७९ टक्के, राष्ट्रवादीला १६.७१ टक्के, शिवसेनेला १६.४३ टक्के, मनसेला २.२७ टक्के आणि इतरांना १८.६८ टक्के मते पडली आहेत.

हरियाणात भाजप-कॉंग्रेसमध्ये टक्कर
दरम्यान, हरियाणा येथे सुरू असलेल्या मतमोजणीत भाजप आणि कॉंग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच देसून यत आहे. ९० जागांसाठी होत असलेल्या या मतमोजणीत भाजप ४० तर कॉंग्रेस ३० जागांवर आघाडीवर होते. जननायक जनता पक्ष १० जागांवर आघाडीवर आहे. बहुमतासाठी ४६ जागांची गरज असून भाजपला ६ जागा कमी पडत आहेत. अपक्षाचे ७ आमदार निवडून आले असून त्यांच्याशी संपर्क साधत पुन्हा सत्तेवर येण्यासाठी भाजपचा प्रयत्न चालू आहे.

बंडखोरीचा फटका ः फडणवीस
महाराष्ट्रातील जनतेने आम्हांला स्पष्ट कौल दिलेला आहे. त्याबद्दल मतदारांचे आभार मानतो. मात्र भाजपला बंडखोरीचा फटका बसला आहे. भाजपच्या मंत्री पंकजा मुंडे व सातार्‍याचे माजी खासदार उदयनराजे भोसले यांचा पराभव हे दोन पराभव धक्कादायक असून त्यावर आम्ही चिंतन करू असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
निकाल जाहीर झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील भाजपच्या प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विधानसभा निवडणुकीच्या निकालावर पहिली प्रतिक्रिया दिली. मुख्यमंत्री म्हणाले की, २०१४च्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी आम्हाला मोठे यश मिळाले आहे. गेल्यावेळी लढवलेल्या २६४ पैकी १२२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी मित्रपक्षांसह १६४ जागा लढलो त्यात १०२ जागा मिळाल्या आहेत. यात एकूण २६ टक्के मते भाजपला मिळालेली आहेत असे त्यांनी स्पष्ट केले.

पक्षांतर केलेल्यांतील
३५ पैकी १९ पराभूत
विधानसभा निवडणुकीत महायुतीचे वारे असल्याचा अंदाज बांधत भाजप व शिवसेनेत दाखल झालेल्या ३५ पैकी १९ उमेदवारांना पराभवाची चव चाखावी लागली महायुतीत आलेले १६ उमेदवार विजयी झाले. पराभूत झालेल्यांमध्ये शिवेसनेचे १९ तर भाजपच्या ८ उमेदवारांचा समावेश आहे. मात्र शिवसेनेतून राष्ट्रवादी कॉंग्रेसमध्ये दाखल झालेले ठाणे जिल्ह्यातील शहापूर मतदारसंघातील दौलत दरोडा हे १५ हजार मताधिक्क्यांनी विजयी झाले.

पंकजा मुंडे, उदयनराजेंचा पराभव
सातारा लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या तिकिटावर विजयी झालेल्या उदयनराजे भोसले यांनी अवघ्या तीन महिन्यांत खासदारकीचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेश केला होता. उदयनराजेंच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आले होते. मात्र तरीही उदयनराजेंचा पराभव झाला.

कोकणात सेनेचा भगवा
राज्यात विधानसभा निवडणुकीत कोकणपट्‌ट्यात पुन्हा एकदा शिवसेनेचाच भगवा फडकला. कोकणातील एकूण ८ पैकी ६ मतदारसंघांत शिवसेनेचे उमेदवार निवडून आले. दापोली, गुहागर, रत्नागिरी, राजापूर, कुडाळ आणि सावंतवाडी या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार विजयी झाले असून कणकवलीमध्ये भाजपचे नितेश राणे तर चिपळूणमधून कॉंग्रेस-राष्ट्रवादीचे शेखर निकम विजयी झाले.