भारत – पाक अणुयुद्ध खरेच झाले तर?

0
140
  • कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त)

पाकिस्तानी पंतप्रधानांनी केवळ भारतालाच अणुयुद्धाची धमकी दिली नसून २७ ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र संघ आमसभेच्या व्यासपीठावरून इम्रान खानने सर्व जगाला या आण्विक युद्धाचे परिणाम भोगावे लागतील, अशी उघड धमकी दिली. अशा प्रकारचे युद्ध झाले तर पहिल्या पाच-सहा दिवसांमध्येच अंदाजे ५०-१२५ दशलक्ष लोकांचे प्राण जातील..

भारत व पाकिस्तान यांच्यात अणुयुद्धाच्या शक्यता बळावल्या आहेत. दोन्ही देशांमधील सामरिक आणि वैज्ञानिकदृष्ट्या अपरिपक्व लोक ‘जर त्याला खुमखुमी असेल तर असे युद्ध एकदा होऊनच जाऊ द्या’ या विचारसरणीचे पुरस्कर्ते आहेत. पण जर अशा प्रकारचे युद्ध झाले तर पहिल्या पाच-सहा दिवसांमध्येच अंदाजे ५०-१२५ दशलक्ष लोकांचे प्राण जातील, असा इशारा अमेरिकेतील कोलोरॅडो बाऊल्डर अँड रटगर युनिव्हर्सिटीच्या सायन्स ऍॅडव्हान्सेसमध्ये प्रसिद्ध झालेल्या हायपोथेटिकल स्टडीमध्ये देण्यात आला आहे. काही वर्षांपूर्वी भारतीय सेनेने केलेल्या सामरिक आभासी युद्धाभ्यासात जवळपास असेच निष्कर्ष निघाले होते.

भारत-पाकिस्तान आण्विक युद्धाच्या अभ्यासासाठी, कोलोरॅडो युनिव्हर्सिटीच्या स्टडी टीमने वातावरणासहित स्टेट ऑफ आर्ट अर्थमॉडेल विथ ड्यू ऍटमॉसफिअर तयार करून, या आण्विक युद्धाचा काय परिणाम होईल याचा अभ्यास केला. भारत-पाकिस्तानमधील आण्विक युद्धाच्या गृहीत परिणामांपर्यंत पोचण्यासाठी स्टडी ग्रुपने अमेरिकन सैनिकी अधिकार्‍यांचे सल्ले घेतले.

पाकिस्तानकडे आण्विक अस्त्रे नेणारी एफ-१६ आणि मिराज ३, मिराज ४ ही २१०० किलोमीटरचा पल्ला असणारी लढाऊ विमाने, ३५० किलोमीटरचा पल्ला असणारी क्रूझ क्षेपणास्त्रे आणि २७५० किलोमीटरचा पल्ला असणारी बॅलेस्टिक मिसाईल्स आहेत. यांच्या द्वारे तो भारतात कुठेही हल्ला करू शकतो. दुसरीकडे, भारतीय वायुदलात १८५० किलोमीटर पल्ला असणारी मिराज २००० व जग्वार लढाऊ विमाने, ३२०० किलोमीटर आणि ५२०० किलोमीटर पल्ला असणारी बॅलेस्टिक मिसाईल्स आणि अण्वस्त्रे नेणारे एक जहाज व दोन पाणबुड्या आहेत. यांच्या माध्यमातून भारत संपूर्ण पाकिस्तान व चीनवर आण्विक हल्ला करू शकतो. भारत-पाकिस्तान अणुयुद्ध सुरू होण्यासाठी नेहमी चार पर्यायांचा विचार करण्यात येतो –
अ) पारंपरिक युद्ध सुरू झाल्यावर पाकिस्तानला जर शंका आली की भारतीय आक्रमण यशस्वी होत आहे,
ब) दोन्हीपैकी एका देशाची कमांड कंट्रोल सिस्टीम निष्क्रिय झाली
क) पाकिस्तानमधील किंवा बाह्यदेशातील जिहादी आतंकवाद्यांनी पाकिस्तानी आण्विक अस्त्रे आपल्या ताब्यात घेतल्याचे आणि ते भारताविरुद्ध वापरात येणार आहे, असे सॉलिड रॉ इंटलिजन्स भारताला मिळाले
आणि ड) दुसर्‍याच्या युद्धाभ्यासाला एकाने आपल्यावर होणारे आक्रमण मानले.
या स्टडी टीमने विचारात घेतलेल्या परिस्थितींनुसार, पाकिस्तानमधून कार्यरत असणार्‍या जिहादी आतंकवाद्यांच्या हल्ल्यानंतर भारतीय सेनेने आपल्या जबाबी हल्ल्यात पाकिस्तानव्याप्त काश्मीर व गिलगिट बाल्टिस्तानमध्येे इंटिग्रेटेड बॅटल ग्रुपचे रणगाडे घुसवले. या भारतीय धडकेत संपूर्ण काश्मीर हातातून जाईल या भीतीमुळे पाकिस्तान चाल करून येणार्‍या आयबीजींवर बॅटलफिल्ड टॅक्टिकल न्यूक्लियर वेपन्सनी हल्ला करतो आणि भारत-पाकिस्तान अणु युद्धाला सुरवात होऊ शकते.

या आण्विक युद्धात छोट्या शहरांवर ०.५ ते ९ किलो टन आणि मोठ्या शहरांवर १०-१५ किलो टनचे न्यूक्लियर एयर बर्स्टस मारले जातील आणि त्यांच्यामुळे एक ते आठ लाख लोकांचा तात्काळ मृत्यू होऊ शकतो व अंदाजे वीस हजार ते तीन लाख लोक गंभीररित्या जखमी होऊ शकतात. याऐवजी जर एखाद्या ठिकाणावर १०० किलोटनचा अणुबॉंब टाकण्यात आला तर २० लाख लोक तत्काळ निजधामास जातील आणि १० लाख गंभीर जखमी होतील. सैनिकी, संसदनीय, सामरिक लक्ष्यांवर ग्राउंड बर्स्टस मारले जातील. चाल करून येणार्‍या आर्मर्ड व्हेइकल्सवर पाकिस्तान टॅक्टिकल न्यूयक्लियर वेपन्सचा मारा करेल, असे या मध्ये मानले गेले आहे.

द्वितीय महायुद्धाच्या सहा वर्षांत जेवढे लोक मारले गेले, त्यापेक्षा भारत- पाकिस्तानच्या अणुयुद्धातील मृत्यूचा आकडा मोठा असेल. भारत व पाकिस्तान दोघांकडेही आजमितीला प्रत्येकी अंदाजे १५० अण्वस्त्रे आहेत आणि २०२५ पर्यंत हा आकडा २२५-२५० ला पार करील असा अंदाज आहे. या अणुयुद्धाचे परिणाम केवळ भारत पाकिस्तानच नाही, तर सर्व जगाला भोगावे लागतील. युद्धाचे परिणाम जीवहानीच्या स्वरुपात गंभीर होतील यात शंकाच नाही. पण याचबरोबर संपूर्ण पृथ्वी हिमयुगात (आईस एज) नसेल एवढ्या प्रचंड मोठ्या शीतलहरींच्या तडाख्यात सापडेल. पाकिस्तान भारताला अणुयुद्धाच्या धमक्या आधी कारगिल युद्ध, नंतर २६/११ च्या मुंबईवरील जिहादी हल्ला आणि सरते शेवटी बालाकोटवरील भारतीय हवाई हल्ल्यापर्यंत सततच देत असला तरी भारताने कलम ३७० आणि ३५-ए मध्ये यथायोग्य बदल केल्यापासून भारत पाकिस्तामध्ये प्रचंड मोठा सामरिक तणाव निर्माण झाला आहे. पाकिस्तानी पंतप्रधानांनी केवळ भारतालाच अणुयुद्धाची धमकी दिली नसून २७ ऑक्टोबर रोजी संयुक्त राष्ट्र संघ आमसभेच्या व्यासपीठावरून इम्रान खाननी सर्व जगाला या आण्विक युद्धाचे परिणाम भोगावे लागतील, अशी उघड धमकी दिली आहे.
भारत-पाकिस्तान अणुयुद्ध झाल्यास जगाचा सामान्य वार्षिक मृत्यूदर किमान अडीच पट होईल व आगामी काही वर्षे तो सरासरीपेक्षा किमान ५० टक्के जास्त राहील. जगाने कधी विचारसुद्धा केला नसेल असा भयंकर न भूतो न भविष्यती नरसंहार जगाला पाहायला मिळेल. १९६० च्या दशकात अमेरिका व रशियामध्ये क्युबन क्रायसिस निर्माण झाला तेव्हाच आण्विक युद्धाच्या धोक्यांवर संशोधन सुरु झाले होते. १९८०च्या दशकात पहिल्यांदा अणुयुद्धामुळे प्रचंड शीत लहरींचा न्यूक्लियर विंटर निर्माण होईल यावर अमेरिका व रशिया या तत्कालीन जागतिक महाशक्तींचे एकमत झाले. आता भारत-पाकिस्तानमधील सामरिक तणावामुळे जगाला परत एकदा त्या धोकादायक प्रणालीला तोंड द्यावे लागू शकते.

वर उल्लेखल्यानुसार, भारत व पाकिस्तान दोघेही आपली अण्वस्त्रे झपाट्याने वृद्धिंगत करीत आहेत. दोघांची मिळून प्रचंड मोठी (अंदाजे १६० कोटी) लोकसंख्या आहे. जर अणुयुद्ध झालेच तर काय होईल याचा अभ्यास १९४५ मध्येे हिरोशिमा नागासाकीवर झालेल्या अणुहल्ल्यांचा परिणाम आणि पृथ्वीच्या वातावरणावर अशा प्रकारच्या अणुयुद्धाच्या प्रभावाची संगणकीय प्रेरणायांच्या अनुषंगीय समन्वयाने करण्यात आला. त्या अभ्यासातील एका निष्कर्षानुसार, या आण्विक युद्धाचे परिणाम बहुस्तरीय असतील.

एक) युद्ध सुरु झाल्यानंतरच्या पहिल्या तीन-चार दिवसांतच भारत व पाकिस्तान आपल्या अण्वस्त्रांपैकी बहुतांश अण्वस्त्रे एकमेकांच्या सामरिक/आण्विक/औद्योगिक ठिकाणांवर आणि मोठी लोकसंख्या असलेल्या शहरांवर टाकतील. या अण्वस्त्रांची खरी मारक क्षमता किती असेल याचा अंदाज करणे अतिशय कठीण आहे. कारण १९९८ नंतर दोघांनीही आपल्या आण्विक अस्त्रांचे परीक्षण केलेले नाही. पण संगणकीय अनुमानानुसार, अणुयुद्ध सुरु झाल्यावर दोन्ही देशांमधील किमान १५-२०,००,००० लोक तात्काळ मृत्युमुखी पडतील. यातील काही अण्वस्त्रांच्या स्फोटामुळे तर उर्वरित स्फोटानंरच्या आटोक्याबाहेरील अग्नीतांडवामुळे निजधामाला जातील. एका दिवसात, एका वेळी २५-३०अण्वस्त्रांचा मारा वेगवेगळ्या ठिकाणांवर झाल्यास दररोज अशी हानी होईल. यात सामरिक हानीचा आढावा घेण्यात आलेला नाही. मात्र प्रत्येक दिवशी किमान २५-३०टक्के सामरिक हानी होईल असा अंदाज करण्यात आला आहे.
दोन) प्रत्येक स्फोटाच्या मध्य बिंदूपासूनच्या तीन चार किलोमीटरच्या परिघात स्फोटाचा जोर आणि आगीमुळे दगड-विटांचे मोठमोठे ढिगारे निर्माण होतील. तेवढे क्षेत्र जळून बेचिराख/खाक होईल. काही दिवसांनंतर,उर्वरित जगावर याचे परिणाम झालेले प्रत्ययास येतील.

तीन) आण्विक अस्त्रांच्या रेडिएशनचे दूरगामी परिणाम आतील-बाहेरील परिघात होतील. स्फोटाच्या मध्य बिंदूपासून किमान १५-२० किलोमीटर्सपर्यंत रेडिएशनचा प्रभाव होईल. या परिघातील ३०-५५ टक्के मानव मृत्युमुखी पडतील, काही अपंग होतील आणि उर्वरित रेडिएशनच्या कुठल्या ना कुठल्या प्रभावाखाली येतील. प्रत्येक स्फोट बिंदूपासूनची ही संख्या अंदाजे १५-२०लाख असेल. या स्फोटांनंतर जन्माला येणारी मुले जन्मत:च अपंग असतील आणि हा धोका आगामी किमान १५-२० वर्षे अस्तित्वात राहील. याचा परिणाम समुद्री वाहतुकीवरही होईल.

चार) भारत पाकिस्तानमधील आण्विक युद्धामुळे निर्माण झालेल्या किमान ८००० दशलक्ष पाउंडस्‌च्या घनदाट काळ्या धुरामुळे पृथ्वी भोवतालचे वातावरण संपूर्णतः झाकोळून जाईल. या धुरामुळे सूर्य किरणे अनेक दिवसपर्यंत पृथ्वीस्तरावर पोचू शकणार नाहीत आणि परिणाम स्वरूप, पहिली काही वर्षे पृथ्वीचे वातावरणीय तापमान किमान २५-३० डिग्री सेल्सियसनी खाली घसरेल आणि पुढील काही वर्षे ते किमान १० डिग्री सेल्सियसपेक्षा फॅरेनहिट कमी असेल.

पाच) हा धूर केवळ भारत व पाकिस्तान पर्यंतच बाधित राहणार नसून पश्चिमेला युरोप, उत्तरेला रशिया, पूर्वेला जपान आणि दक्षिणेला ऑस्ट्रेलियापर्यंत या धुराचा लोट वार्‍याबरोबर जाऊन तेथील लोक/समाज जीवनावरही याचे परिणाम झालेले बघायला मिळतील. या धुरामुळे प्रभावित झालेल्या लोकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात श्वसन विकारांना तोंड द्यावे लागेल. याचा परिणाम ग्लेशियर्सवरही होईल आणि समुद्र/नद्यांचे पाणी अनेक वर्षांसाठी प्रदूषित होईल. ओझोन लेयरचा जबरदस्त नाश होईल आणि लोकांना सेकंडरी/टर्शरी रेडिएशनच्या भयंकर दुष्परिणामांना समोर जावे लागेल.
सहा) या युद्धानंतर धूर व रेडिएशनमुळे वृक्ष, भाजीपाला,गवत आणि वन्य संपत्तीच प्रजनन फार मोठ्या प्रमाणात कमी होईल. यामुळे समुद्रातील अल्गीज नष्ट पावतील आणि त्यांचे प्रजनन न झाल्यामुळे समुद्री वातावरणावर याचा फार मोठा परिणाम होईल. पाऊस/बर्फ २५-४०टक्के व शेती ३५-६० टक्वयांनी कमी होईल. या सर्वांचा एकत्रित परिणाम खाद्यपदार्थांच्या स्तरावर आणि पर्यायांनी मनुष्यांवरही होईल. यामुळे जगात आधी अन्नाची वानवा भासू लागून नंतर दुष्काळ पडेल.

सात) या युद्धामुळे किती संसाधनहानी आणि वित्त हानी होईल याची कल्पना करणे देखील अशक्य आहे. पण प्रत्येक देशासाठी ही हानी अब्जावधी कोटी रुपयांची असेल. प्रत्येक स्फोटाच्या मध्य बिंदूपासून किमान २० किलोमीटर्सचा प्रदेश बेचिराख होईल जेथे आगामी किमान वीस वर्षे काहीही होणार/होऊ शकणार नाही. या क्षेत्रामधली हानी ही केवळ भारत पाकिस्तानचीच नसून येथे आर्थिक/मानवी गुंतवणूक केलेल्या प्रत्येक देशाची असेल. संपूर्ण जगाची अर्थ व सामाजिक आरोग्य व्यवस्था पार कोलमडून पडेल.

आठ) या अहवालातील अंदाजानुसार, अणुयुद्ध झाल्यास दोन्ही देशांकडून, सामरिक/आण्विक संसाधनांवर ३० टक्के आणि प्रचंड लोकसंख्येने गजबजलेल्या छोट्या/मोठ्या शहरांवर उर्वरित ७० टक्के अण्वस्त्रांचा मारा करण्यात येईल. अगदीच नजदिकी भविष्यात अणुयुद्ध झालं तर भारताच्या ७६९ मोठ्या शहरांपैकी १०० आणि पाकिस्तानची सर्वच्या सर्व १०० मोठी शहर नष्ट होतील. २०२५ पर्यंत हे युद्ध लांबले तरी भारताची १७० मोठी शहर नष्ट होतील आणि पाकिस्तान मात्र अक्षरश: बेचिराख होऊन जाईल. त्याचे नामोनिशाण जगाच्या नकाशातून संपूर्णपणे नाहीस होईल. शहरांवर डायरेक्ट किंवा कोलॅटरल टारगेटिंगच्या माध्यमातून आण्विक हल्ला होईल. या अभ्यासातील निष्कर्षांचा परिणाम पाकिस्तानवर काय होईल किंवा तो याला किती महत्व देईल हे सांगण कठीण आहे. तेथे या अहवालाचा/अभ्यासाचा परामर्श तरी घेतला गेला की नाही याची कल्पना नाही. पण पाकिस्तानी सेनाध्यक्षांनी वित्तीय तूट कमी करण्यासाठी ५ ऑक्टोबरला पाकिस्तानचे सर्व आर्थिक व्यवहार आपल्या हाती घेतल्याची वदंता आहे. अणुयुद्धाचे परिणाम पाकिस्तानातील राजकारणी आणि सामान्य नागरिकांपेक्षा एका फौजीला जास्त चांगल्या प्रकारे कळतील अशी आशा करायला हरकत नाही. आपली शहामृगी वृत्ती त्यागून दोन्ही देशांनी या अहवालाचा आणि त्यामधील निष्कर्षांचा विचार करणे आवश्यक आहे. शीतयुद्ध संपले तरी अणुयुद्धाचा धोका आणि त्याच्या परिणामांमध्ये यत्किंचितही बदल झालेला नाही, याची भारत, पाकिस्तान व जगाने दखल घेतलीच पाहिजे; अन्यथा सर्वनाश अटळ आहे.