विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील पहिला उपांत्य सामना काल रंगतदार अवस्थेत असताना पावसाचे आगमन झाल्याने स्थगित करावा लागला असून उर्वरित खेळ आज होणार आहे.
भारतीय गोलंदाजांनी केलेल्या अचूक मार्यामुळे न्यूझीलंडने पाऊस आला त्यावेळी ४६.१ षटकांत ५ बाद २११ धावांपर्यंत मजल मारली होती. यानंतर रात्री उशिरापर्यंत सामना पुन्हा सुरू होऊ शकला नाही. त्यामुळे पंचांनी खेळपट्टीची पाहणी केल्यानंतर पंच आणि सामनाधिकार्यांनी कालचा खेळ स्थगित करण्याचा निर्णय जाहीर केला. नियमानुसार उर्वरित खेळ आज बुधवारी होणार असल्याचे पंचांनी जाहीर केले. काल भारतीय गोलंदाजांनी टिच्चून मारा करीत चांगलाच लगाम घातला.